- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : J GREEN तर्फे नियोजनशून्य, ढिसाळ आणि निकृष्ट ‘विकास’ कामाविरुद्ध आवाज उठविला

नागपूर समाचार : आम्ही नागपूरचे सर्वसामान्य नागरिक, जे ग्रीन नागपूर ग्रुपचे सदस्यही आहोत, एकत्र येऊन संपूर्ण शहरात सुरू असलेल्या नियोजनशून्य, ढिसाळ आणि निकृष्ट ‘विकास’ कामाविरुद्ध आवाज उठवला आहे. आम्ही एक गैर-राजकीय गट आहोत ज्याची स्थापना रस्त्यांवर पाणी साचणे, जीव व मालमत्तेला धोका निर्माण करणारा विनाशकारी पूर आणि झपाट्याने कमी होत जाणारे वृक्ष व हिरवे आच्छादन यासारख्या नागरिकांच्या तक्रारी पुढे आणण्यासाठी करण्यात आली आहे. शहराला 2018 पासून सतत पुराचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्यांचे कष्टाच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, तरीही प्रशासन यावर योग्य उपाययोजना करण्यात अपयशी ठरले आहे.

अंबाझरी पुरामुळे झालेली अनागोंदी हे त्याचेच उदाहरण आहे. विकासाच्या नावाखाली विचार न करता हजारो झाडे तोडली जात आहेत. आपल्या सुंदर शहराचा हा विध्वंस पाहून आपण मूक प्रेक्षक राहू शकत नाही याविरोधात ऑनलाईन याचिका सुरू करण्यात आली असून त्याला सर्वसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

आम्ही हे आवर्जून सांगू इच्छितो की आम्ही विकासाच्या विरोधात नाही, तर लोकांच्या सुरक्षेकडे पूर्ण दुर्लक्ष करून, नागरी अधिकारांच्या विरोधात, अत्यंत आकस्मिक, निकृष्ट, अविवेकी आणि अक्षम रीतीने अंमलबजावणी करण्याच्या विरोधात आहे. नागपुरातील सिमेंट रस्त्यांना आम्ही निश्चितपणे विरोध करत आहोत, विशेषतः नागरी वस्त्यांमधील उपमार्गामध्ये भविष्यात पाणी साचण्याचे भयंकर परिणाम भोगावे लागू नयेत म्हणून आम्ही योग्य ड्रेनेज व्यवस्थेची मागणी करतो आहे.

या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि कृती आराखडा तयार करण्यासाठी रविवारी 4 ऑगस्ट रोजी समविचारी गट आणि व्यक्तींची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीला शहराच्या सर्व भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कामाच्या अंमलबजावणीसाठी प्रभारी अधिकारी आणि कंत्राटदारांकडून वैयक्तिक निषेधास तुच्छतेची वागणूक दिली जात असल्याने समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी निषेध रॅली काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

त्यानुसार सकाळी 10 वाजता निषेध यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही निषेध यात्रा रविवारी 11 ऑगस्ट 2024 रोजी, व्हरायटी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून निघून रिझर्व्ह बँकेजवळील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत चालेल. या रॅलीला बाधित व्यक्ती तसेच नागपुरातील सामाजिकदृष्ट्या जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *