- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

नागपूर समाचार : सामाजिक तळमळीतून साहित्यिक जन्माला येतो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे उदघाट्न; साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना ‘राज्य अतिथी’चा दर्जा देण्याची घोषणा 

वर्धा समाचार : समाजाला भेडसावणारे मुद्दे, त्याविषयी वाटणारी तळमळ आणि सामाजिक जाणीव यातून एक उत्तम आणि जबाबदार साहित्यक जन्मला येतो अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिमित्‍त अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाच्‍या वतीने वर्धा येथील राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी साहित्‍यनगरीमध्‍ये 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. स्‍वावलंबी शिक्षण मंडळाच्या पटांगणत साहित्‍य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून याठिकाणी साहित्‍य नगरी सजली आहे.

साहित्‍य संमेलनाचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर व्‍यासपीठावर मुख्‍यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी कार्यक्रमाला राज्‍याचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक न्‍या. नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्‍याक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक भारत सासणे, स्‍वागताध्‍यक्ष दत्‍ता मेघे यांच्‍यासह ज्‍येष्‍ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्‍वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्‍वास, खासदार, जिल्ह्यातील आमदार,तसेच आमदार डॉ. विश्‍वजीत कदम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अखिल भारतीय महामंडळाच्‍या अध्‍यक्ष प्रा. उषा तांबे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शासन कायम साहित्यिक मंडळींच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. समाजासाठी अनेक विकास कामे होत आहे. अश्या विकास कामांचा उल्लेख देखील साहित्यकांनी आपल्या रचनांमध्ये करावा असे ते म्हणाले. याशिवाय ग्रामीण भाषा, बोली भाषा संवर्धनासाठी शासन प्रयत्न करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातील थोरामोठांच्या यशोगाथा अधिक व्यापक स्वरूपात पुढे आणता येतील का, चांगल्या परदेशी साहित्याचा अनुवाद केल्या जाऊ शकेल का अश्या मुद्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.

सेवाग्राम मार्गावर लाईट आणि फाउंटन शो सुरु करण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगत गांधी आणि विनोबा भावेंच्या भूमीला त्यांनी नमन केले. याशिवाय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना ‘राज्य अतिथी’चा दर्जा देण्याचे निवेदन मान्य केल्याची घोषणा त्यांनी केली. संमेलनाच्या आयोजनासाठी त्यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि साहित्य प्रेमींचे स्वागत देखील केले.

संमेलनाचे अध्यक्ष न्या, चपळगावकर यांनी थोडक्यात व्यक्त केलेल्या मनोगतात विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष दिवंगत मनोहर म्हैसाळकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. नुकत्याच शासन आयोजित साहित्य संमेलनाबाबत बोलताना त्यांनी असे आयोजन स्वायत्त संसथा यांच्या मार्फत व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुरवातीला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांनी मनोगत व्यक्त केले.

विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष दिवंगत मनोहर म्हैसाळकर यांच्या स्मृतींना उजाळा देऊन साहित्य परंपरा जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे यांनी साहित्य संमेलन सर्वार्थाने फलद्रुप व्हावे अशी आशा व्यक्त केली आणि या संमेलनासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि साहित्य प्रेमींचे स्वागत केले. यावेळी त्यांनी वर्धा आणि साहित्ययिक परंपरा याबद्दल विविध आठवणींना उजाळा दिला. 

त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी वर्ध्याच्या साहित्य संमेलनाचे विशेष महत्व विशद केले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजन , नियोजनासाठी २ कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मावळते अध्यक्ष सासणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की समाजाला पुन्हा पुन्हा महात्मा गांधींच्या विचाराकडे यावे लागेल. गांधींचे विचार हे कायमच दिशा दर्शक असल्याचे ते म्हणाले. त्यापूर्वी त्यांच्या कार्यकाळातील कार्यांचा त्यांनी आढावा घेतला आणि त्यांनी नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या कार्यवाह उज्ज्वल मेहेंदळे यांनी केले तर सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. यावेळी विदर्भ साहित्य संघ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सदस्य आणि चमू उपस्थित होते.

भाषांचे महत्‍त्‍व जपणे गरजेचे – दीपक केसरकर

राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पुस्तकांचे आणि भाषांचे महत्व जपणे आवश्यक असल्याचे वक्तव्य केले. साहित्यिक मंडळीला अधिक सोयी सुविधा मिळाव्या म्हणून साहित्य भवन मुंबई मध्ये निर्माण होत आहे. साहित्यिक तिथे राहू शकतील, इथे नाट्यगृह आणि इतर सोयी सुविधा असेल आणि दोन वर्षांनी ते उपलब्ध होणार आहे अशी माहिती दिली.

महाराष्ट्रात कायम साहित्यिक आणि त्यांच्या विचारांचा, सूचनांचा आदर होईल. साहित्यिक आणि राजकारणी यात आणीबाणीची स्थिती कधीही येणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. पुढच्या मराठी भाषा विश्व संमेलनाला १५ कोटींची तरतूद केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मातृभाषेत शिक्षण याबाबत बोलताना एका वर्षात मराठी मध्ये इंजिनियरिंग चे पुस्तक शक्य झाले असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

भाषेचा उपयोग कला जोपासण्‍यासाठी – विश्‍वनाथ प्रसाद तिवारी

पद्मश्री विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी सम्बोधीत करताना सांगितले की भाषा मनुष्याला पशु पासून वेगळी करते. भाषेचा उपयोग उत्तमोत्तमपणे करण्याची कला आपण जोपासायला हवी. त्यामुळे भाषेचे रक्षण, संवर्धन, प्रचार आणि प्रसार करणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. 

सूत्र प्रदान सोहळा 

मावळते अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत ससाणे यांनी अध्यक्षपदाची सूत्र विद्यमान अध्यक्ष न्या. चपळगावकर यांना दिली. यानंतर विदर्भ साहित्य संघ शताब्दी विशेष अंक ‘दौत लेखणी ‘ चे विमोचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते झाले.

कुमार विश्वास यांच्या भाषणाची उत्सुकता 

लोकप्रिय हिंदी साहित्यिक आणि कवी कुमार विश्वास यांच्या संबोधांची उत्सुकता सर्वाना होती. सर्वात प्रथम त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी आपल्या खास शैली मध्य ‘राजकारण आणि साहित्य’ यावर भाष्य केले.

‘राजनीती जब जब लडखडाई तो साहित्य ने संभाला’ असे सांगतानाच साहित्यिकांचे काम राजकारणाला दिशा दाखवण्याचीआहे असे ते म्हणाले. लोकमंगल साधणाऱ्या राजकारणाची स्तुती आणि जिथे चुका होत आहेत त्याची दखल घेण्याचे आणि टिप्पणी करण्याचे कार्य सर्वच आणि विशषे करून तरुण साहित्यिकांनी करावे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मराठी साहित्य आणि यात योगदान देणाऱ्या लोकमान्य टिळकांसह अनेकांचा उल्लेख केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *