नागपुर समाचार :श्रीक्षेत्र महाकाली येथे शुक्रवार दिनांक 19 मे रोजी शनी जयंती व वटसावित्री निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी त्रिदेविंचे अष्टांग योग पद्धतीने पूजन,क्षहोम हवन करण्यात आले.
नंतर पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांचे शनि जयंती च्या महात्म्यावर प्रवचन देताना म्हणाले की, सूर्य पुत्र शनीदेवाला महाबली आणि ग्रहांचा राज म्हटले आहे- ‘सौरिग्रहराजो महाबलः।’ प्राचीन ग्रंथांप्रमाणे शनीदेवाने महादेवांची भक्ती आणि तपस्येने नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान मिळवले आहे.
एकेकाळी सूर्यदेव जेव्हा गर्भाधारणेसाठी आपल्या पत्नी छाया यांच्या जवळ गेले तर पत्नीने सूर्याच्या प्रचंड तेजमुळे भयभीत होऊन आपले डोळे बंद करुन घेतले. नंतर छाया यांच्या गर्भातून शनीदेवांचा जन्म झाला. शनी श्याम वर्ण असल्यामुळे सूर्याने आपल्या पत्नीवर आरोप लावला की शनी माझा पुत्र नाही, तेव्हापासून शनी आपल्या वडील अर्थातच सूर्याशी शत्रुता ठेवतात.
शनीदेवाने अनेक वर्ष तहान-भूक सहन करत महादेवाची आराधना केली आणि घोर तपस्येने आपली देह दग्ध करुन घेतली होती, तेव्हा शनीदेवाच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने शनीदेवाला वर मागायला सांगितले.
शनीदेवाने प्रार्थना केली की अनेकु युगांपासून माझी आई छाया यांची पराजय होत आहे, त्यांचा माझ्या वडील सूर्याकडून अपमानित व प्रताडित केले गेले आहे. म्हणून मी आपल्या वडीलांपेक्षा अधिक बलवान, सामर्थ्यवान आणि पूजनीय होऊ अशी माझ्या आईची इच्छा आहे. तेव्हा महादेवाने त्यांना वरदान देत म्हटले की नवग्रहांमध्ये आपलं स्थान सर्वश्रेष्ठ असेल. आपण पृथ्वीलोकात न्यायाधीश व दंडाधिकारी असाल.
सामान्य मानवचं नाही तर देवता, असुर, सिद्ध, विद्याधर आणि नाग देखील आपल्या नावाने भयभीत होती. ग्रंथांप्रमाणे शनीदेवांचे गोत्र कश्यप असून सौराष्ट्र त्यांची जन्मस्थळी असल्याचे मानले जाते.
यानंतर वटसावित्रीचे महात्म्य विशद करताना पंडितजी म्हणाले की, अश्वपती या राजाची एकुलती लाडकी कन्या सावित्री उपवर झाली तेव्हा त्याने तिला पती निवडण्याचा अधिकार दिला. यावरून त्या काळात स्त्री स्वातंत्र्य आणि सन्मान होता, ही बाब लक्षात येते. सावित्रीने एका देखण्या, निर्धन, गरीब अशा सत्यवान या तरुणाची पती म्हणून निवड केली.
सात्विक व विश्वासू वृत्ती असल्याने दरबारातील काही व्यक्तींनी गैरफायदा घेऊन त्यांचे राज्य गिळंकृत केले होते. सत्यवान आई-वडिलांना घेऊन रानावनात भटकत होता. विवाह ठरल्यानंतर नारद मुनींनी सावित्रीचे मन बदलण्याचा प्रयत्न केला. सत्यवान अल्पआयुष्यी आहे, एक वर्ष त्याचे आयुष्य आहे, तू लग्न करू नकोस, असे समजावले. पण ती आपल्या विचारापासून ढळली नाही. योग्य मुहूर्तावर तिचा सत्यवानाशी विवाह झाला. बघता बघता वर्ष कधी संपले हे लक्षातही आले नाही.
एक दिवस सत्यवान जंगलात लाकडं तोडण्यासाठी जातो. सावित्री देखील त्यांच्यासोबत जाते. लाकडं तोडता तोडता सत्यवानला भोवळ येते आणि तो जमिनीवर पडतो. यमराज तिथे येतात आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागतात. सावित्री देखील यमाच्या मागे आपल्या पतीसोबत जाऊ लागते. यम अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगतात. पण ती साफ नकार देते आणि आपल्या पतीसोबत जाण्याचा हट्ट धरते अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले.
सावित्रीनेसासऱ्यांचे डोळे आणि राज्य परत मागितले. तिसरे वरदान म्हणून तिने मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी होऊ दे अशी इच्छा व्यक्त केली. यमराजाने नादात तथास्तू म्हटलं. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. यानंतर बाहे परिवाराकडून महाप्रसाद वितरीत करण्यात आला. यावेळी असंख्य माई भक्तांनी उपस्थित होते.