- Breaking News, उत्सव, मुंबई समाचार

मुंबई समाचार : महाराष्ट्राची प्रगती आणि आर्थिक आत्मनिर्भरतेचा जयघोष

मुंबई समाचार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय राष्ट्रध्वजवंदन व संचलन कार्यक्रमात सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

भारताला जगातील सर्वोत्तम संविधान दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीच्या सर्व सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताकडे जागतिक पातळीवर एक महत्त्वाची अर्थव्यवस्था म्हणून पाहिले जात आहे. हे सर्व आपल्या लोकशाही आणि संविधानामुळेच शक्य झाले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी या भूमीला स्वाभिमान शिकवला. आज देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून महाराष्ट्र अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे. नुकतेच दावोस येथे करारामार्फत महाराष्ट्रात सुमारे ₹30 लाख कोटींची गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्र थांबणार नाही, तर पुढेच जात राहील, हे अधोरेखित झाले आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीचे काम शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी शासन सातत्याने सकारात्मक भूमिका घेत आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. समाजातील वंचित घटकांसाठी विविध योजना राबवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शासन करत आहे. 

निश्चितच येत्या काळात महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.