जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त साधला संवाद
नागपूर समाचार : कोण काय म्हणतो, कोण आपल्याबद्दल काय विचार करतो, याची चिंता करण्यापेक्षा आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर २०२५) ज्येष्ठ नागरिकांना केले.
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने संताजी सभागृहात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तेली समाज सभेच्या सौजन्याने आयोजित या ज्येष्ठ नागरिक संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता मेघे, प्रा. अनिल सोले, राजू मिश्रा, बाबासाहेब नंदनपवार, नाना ढगे, अशोक मानकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले, ‘ज्याचा जन्म झाला, त्याचा मृत्यू अटळ आहे. याला कुणीही अपवाद नाही. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणायचे, ‘एखादी व्यक्ती किती जगली, त्यापेक्षा ती कशी जगली, हे अधिक महत्त्वाचे असते.’ त्यामुळे आपल्याला मिळालेले जीवन आनंदात घालविण्याचाच विचार करावा. त्यासाठी आपले व्यक्तित्व, विचार करण्याची पद्धत, आपला स्वभाव हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातूनच आनंद निर्माण होऊ शकतो.’
‘छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतल्याने आपण अस्वस्थ होत असतो. अश्याने जीवनाचा आनंद घेता येणार नाही. कारण आनंद कुठल्याही बाजारात मिळत नाही. तो तुम्हाला प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये शोधावा लागणार आहे,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.
दत्ता मेघे म्हणाले, ‘अनुभवाने समृद्ध असलेले ज्येष्ठ नागरिक समाजाला दिशा देणारे असतात. त्यादृष्टीने तरुण पिढीला ज्येष्ठांचा आदर करण्याचा संदेश देणारे आजचे आयोजन आहे.’
बाबासाहेब नंदनपवार म्हणाले, ‘वृद्धत्व हा जगाचा नियम आहे. पण वृद्ध होणे हा नियम नाही. आपल्याला ज्येष्ठ व्हावे लागते. ज्येष्ठांनी जगण्याची वृत्ती बदलली पाहिजे आणि नियोजन केले पाहिजे.’









