- Breaking News, अपघात

अमरावती समाचार : धोक्याच्या वळणावर नियंत्रण सुटलं अन् बस थेट नदीत कोसळली, चौघांचा मृत्यू २५ जखमी

अमरावती समाचार : अमरावती येथे भीषण अपघात झाला आहे. येथे एक बस थेट नदीपात्रात कोसळून मोठा अपघात झाला. यामध्ये आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी (सोमवार २३ सप्टेंबर) अमरावती येथून धारणीकडे जाणाऱ्या चावला ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण अपघात झाला. ही ट्रॅव्हल्स बस थेट नदीपात्रात कोसळली. त्यावेळी या बसमधून ५० प्रवासी प्रवास करत होते. या भयंकर घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून २५ प्रवाशी जखमी असल्याची माहिती आहे. अपघातानंतर सर्व जखमींना तात्काळ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

सध्या जखमींवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी ७ प्रवासी हे गंभीर असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय ( इर्विन) येथे हलवण्यात आले आहे. तर, उर्वरित १८ प्रवाशांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या घटनास्थळी पोलिसांकडून स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने मदत कार्य राबविण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

मेळघाटात सीमा डोहलगत अमरावतीवरून धारणीकडे जाणारी चावला ट्रॅव्हल्स ही खाजगी बस पुलावरून नदीत कोसळली. या अपघातामुळे सेमाढोह परिसरात खळबळ उडाली असून बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, २५ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

अमरावती वरून धारणीला निघाली होती बस

चावला ट्रॅव्हल्स कंपनीची बस नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता अमरावती येथून धारणीला निघाली होती. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सेमाडोह येथील भूतखोरा परिसरात धोक्याच्या वळणावर असणाऱ्या नदीच्या पुलावर बस चालकाचे नियंत्रण सुटलं आणि ही बस पुलाखाली थेट नदीत कोसळली.

बचाव कार्य सुरू

हा अपघात घडताच सेमाडोह येथील रहिवासी घटनास्थळी धावून गेले. व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले. नदीत कोसळलेल्या अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेचत. या अपघाताची माहिती परतवाडा, चिखलदरा आणि धारणी पोलिसांना देण्यात आली. या तिन्ही शहरातून बचाव पथक अपघात स्थळी रवाना झाले असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *