- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ‘भारतीय हे नागरिक दे भारतमाता हाक’ ने दुमदुमले नागपूर

स्वातंत्र्यवीर सावरकरांना मैत्री परिवार व सांस्कृतिक विभागातर्फे अनोखी आदरांजली

नागपूर समाचार : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीची यावर्षीची पूर्वसंध्या नागपुरकरांकरिता भावपूर्ण आणि अनंतकाळ स्मरणात राहणारी ठरली असून, भारतीय हे नागरिका दे भारतमाता हाक या आर्त कवनाने नागपूरनगरी दुमदुमली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे व मैत्री परिवार संस्था,ब्लाईंड रिलीफ असोसिएशन तसेच सुरसंगम यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीनिमित्त ‘वीर सावरकर’ या दृक-श्राव्य कार्यक्रमाचे दक्षिण अंबाझरी मार्गावरील बी. आर. मुंडले येथे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर व भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत या कार्यक्रमाची सुरुवात झाली हे विशेष. वंदे मातरमच्या जयघोषात पुढे या कार्यक्रमाचा निनाद आसमंतात दुमदुमला. भारतमातेच्या स्वरूपातील कलाकार दीपलक्ष्मी भट यांनी राष्ट्रभक्ती आणि सावरकरांचे योगदानाला यावेळी उजाळी दिली.

‘भारतीय हे नागरिक दे भारतमाता हाक’ या आर्त कवणरूपी पोवाड्यातून गायिका सुरभी ढोमणे व गायक अमर कुलकर्णी यांच्या चमूने उपस्थित राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये राष्ट्रीयत्वाचे स्फुल्लिंग चेतवले. यावेळी जयदेव जयदेव जय शिवराया व हे हिंदूनृसिंह प्रभो गीतांच्या गायनातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदनाही देण्यात आली. सहगायक आकांक्षा चारभाई, देविका मार्डीकर, अमेय वैद्य, अक्षय चारभाई यांनी यावेळी सुरेल साथ दिली. नागपूरकरांनी यावेळी सावरकरांनी लिहिलेल्या गीत गायनाची न भूतो न भविष्यती अशी अभूतपूर्व मेजवानी अनुभवली.

‘जयोस्तुतेवरील नृत्य व गायन असो कि ने मजसी परत मातृभूमीला असो’ आजची संध्याकाळ नागपूरकरांना सावरकरांच्या योगदानाची जाणीव करून देणारी ठरली. 

कार्यक्रमात विनय मोडक यांनी सावरकरांना झालेल्या पन्नास वर्षाच्या काळापाण्याच्या शिक्षेचा प्रसंग उभा केला आला असता उपस्थित प्रेक्षकांचे डोळे पाणावून गेले. पतितपावन मंदिरातून सावरकरांनी केलेल्या धर्मकार्याची जाणीव व जात्युच्छेदक विचारधारेला दिलेला तडाखा यावेळी सुरभी ढोमणे व अमर कुलकर्णी यांच्या चमूने आपल्या ‘मला देवांचे दर्शन घेऊद्या’ या गीतातून प्रेक्षकांसमोर सादर केला. अशा या सावरकरांचे सामाजिक कार्य व राष्ट्रभक्तीची जाणीव करून देणाऱ्या आगळ्यावेगळ्या गीतसंध्यारुपी कार्यक्रमाने आपण कृतकृत्य झाल्याची भावना सर्व राष्ट्रप्रेमी रसिकांमध्ये होती.

मैत्री परिवाराचे सचिव प्रमोद पेंडके यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर प्रकाश टाकत देशाला आजही सावरकरांच्या विचारांची त्यांनी केलेल्या समाजसेवेची आजही गरज असल्याची जाणीव उपस्थितांना करून दिली. सावरकरांएवढे कोणीही भोगले नाही. पण तत्कालीन सरकारांनी सावरकर आपल्यापर्यंत पोहोचूच दिले नाही. राजकारणात त्यांचा बळी दिला, अशी खंत व्यक्त केली. यावेळी मैत्री परिवार संस्थेतर्फे सुरु असलेल्या सामाजिक कार्यांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. तसेच यावर्षीचा स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार मैत्री परिवार संस्थेला मिळाल्याची माहिती देखील त्यांनी दिली. कार्यक्रमाचे निवेदन मृणालिनी पाठक तर सूत्रसंचालन अमर कुलकर्णी यांनी केले.

एका कार्यक्रमात सावकर मांडणे म्हणजे चिमुटीत आकाश पकडण्यासारखे असल्याची भावना अमर कुलकर्णी यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सावरकरांच्या मूळ आवाजातील ‘मी प्रेसिडेंट झालो असतो तर’ या भाषणाची श्राव्यफीत ऐकवली. तसेच सावरकरांनी लिहिलेल्या ‘व्याघ्र नक्र सर्प सिंह’ या गीतातून सावरकरांचे मराठी शब्द कौशल्य गीतातून सादर केले. कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन ऋषभ ढोमणे यांनी केले तर रिदम विभाग-विक्रम जोशी, ऑटापॅड-सुभाष वानखेडे, संगीत नियोजन-महेंद्र ढोले, तबलावादन सचिन ढोमणे तर नृत्य – अवंती काटे यांच्या त्रिवेधा कलानिकेतच्या चमू यांनी करीत या कार्यक्रमाला बहार आणला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *