मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आले
नागपूर समाचार : तब्बल एका वर्षानंतर अनिल देशमुख आज (बुधवार) ला तुरुंगाबाहेर आले आहेत. एक वर्ष आणि दोन महिन्यानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले आहेत. मुंबई येथे अनिल देशमुख यांचे कुटुंबिय तुरुंगाबाहेर आले होते. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेतेही आले होते. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश होता. अनिल देशमुख बाहेर येणार, हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात एकच जल्लोष केला. त्याशिवाय आर्थर रोड तुरुंगाबाहेर कार्यकर्ते जमले होते.
देशमुख यांच्या नागपूर येथील घराबाहेरही शेकडो कार्यकर्त्यांनी, ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल, फटाके उडवीत जल्लोष केला. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची कारागृहातून सुटका झाली आहे. 17 दिवसांच्या स्थगितीत जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात सीबीआयला अपयश आलं. सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुख यांची सुटका झाली. न्यायालयावर विश्वास असल्याची प्रतिक्रिया अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांनी दिली. अनिल देशमुख कारागृहाबाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी अनिल भाऊ आगे बडो, हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा दिल्या.
मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आले
मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आले आहे. परमवीर सिंह यांनी माझ्यावर शंभर कोटींचा आरोप लावला. पण त्याच परमवीर सिंह यांनी कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं, त्यामध्ये मी ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केला होता, माझ्याकडे कोणताही पुरवा नाही असं प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी तुरुंगाबाहेर आल्यानंतर दिली. यावेळी अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याच्यावरही वक्तव्य केलं. त्याशिवाय न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं. 1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली होती.