नागपूर, 23 मार्च:- देशाच्या विविध भागातून आलेल्या कवींनी वीर, प्रेम, हास्य रसाच्या कविता सादर रसिकांना भरभरून आनंद दिला. खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा पाचवा दिवस रसिकांच्या टाळ्या, शिट्या आणि हास्याने गाजला.
केंद्रीय मंत्री खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या पाचव्या दिवशी ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्ये हास्य कवी संमेलन पार पडले. यात पद्मश्री कवी सुरेंद्र शर्मा, पद्मश्री सुरेंद्र दुबे, अरूण जेमिनी, डॉ. प्रवीण शुक्ला, कविता तिवारी, डॉ विष्णू सक्सेना व संयोजक नागपूरचे कवी प्रा. मधुप पांडे हे कवी सहभागी झाले होते. नितीन गडकरी यांच्या हस्ते कवींचा सत्कार करण्यात आला. विविध ठिकाणीहून आलेल्या या कविंचे वेगवेगळे रंग आणि ढंग आहेत, असे म्हणत प्रा. मधुप पांडे यांनी सर्वांचे काव्यमय स्वागत केले.
‘सारी धरा तुम्हारे ही गीत गा रही है’, या भारत मातेच्या वंदनेने उत्तरप्रदेशच्या कविता तिवारी यांनी कविसंमेलनाची सुरुवात केली. मातेच्या सर्व रूपांचे वर्णन त्यांनी आपल्या कवितेतून प्रस्तुत केले. शहीद दिवसानिमित्त त्यांनी वीररसाच्या कविता सादर केल्या व ‘सावित्री ना होती तो सत्यवान को बचाता’ असे म्हणत मुलींचे समाजातील महत्व विशद केले.
हरियाणाचे अरुण जेमिनी कवींना कोरोना काळात कसे वर्कफ्रॉम होम करावे लागले याचे वर्णन केले. घरीच कविता म्हटल्या आणि स्वत:च स्वत:ला पैसे दिले, असे सांगत त्यांनी श्रोत्यांना हसवले. ‘हर फैसला होता नही सिक्का उछाल के, ये दिल का मामला है जरा देख भाल के’ असे बदललेल्या प्रेमाचे रूप त्यांनी कवितेतून सादर केले.
छत्तीसगढचे कवी सुरेंद्र दुबे यांनी नागपूरच्या लोकांचा कॉन्फीडन्स किती तगडा आहे आणि येथील लोक किती खास, एकदम झकास आहे याचे उत्तम वर्णन हास्य कवितेतून सादर केले. गावातले म्हातारे लोक टीव्हीवर राखी सावंतचे स्वयंवर बघताना म्हणतात, ‘जब तक सांस है, तब तक आंस है’. ‘ये हास्य का कोकडा, ठहाका का परिंदा है, टेशन में मत रहना, टायगर अभी जिंदा है’ अशा ओळींच्या माध्यमातून आपण अजुन संपलेलो नाही, हे ठासून सांगितले. अलीगढचे डॉ. विष्णू सक्सेना यांनी प्रेम कविता सादर केल्या. प्रवीण शुक्ला यांनी कार्यक्रमाचे काव्यमय निवेदन केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी, महामेट्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर ब्रिजेश दीक्षित, उद्योगपती सत्यनारायण नुवाल, गिरीश व्यास, रमेश मंत्री यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्य बाळ कुळकर्णी, अविनाश घुशे, हाजी अब्दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील यांनी केले आहे.
……………
सर्वांगीण विकास हेच ध्येय
देशातील ज्या आधारावर समाज उभा आहे, ती सांस्कृतिक मूल्य वृद्धींगत झाली पाहिजे. केवळ वीज, पाणी, रस्ते याचा विकास हीच आपली जबाबदारी नाही तर शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, असा प्रयत्न राहिला आहे. त्याचा भाग हा सांस्कृतिक महोत्सव आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.
……………
गडकरी जागृत, संवेदनशील खासदार – भैयाजी जोशी
नितीन गडकरी यांच्या रूपाने जागृत, सक्रीय व संवेदनशील असे खासदार मिळाले, हे नागपूरकरांचे आणि देशाचे भाग्य आहे. त्यांनी आपल्या कामाने ठसा उमटवला असून सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. हा देश समाज, संस्कृती, मूल्य याचा मनापासून स्वीकार असतात तीच व्यक्ती असे कार्यक्रम करू शकते, अशा शब्दात भैयाजी जोशी यांनी नितीन गडकरी यांच्या कार्याचे कौतूक केले.
………………..
आज महोत्सवात
पद्मश्री हेमामालिनी यांची ‘राधा रासबिहारी’ नृत्यनाटिका व समारोप
………