■ पारशिवनी व मौदा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या कामांचा आढावा व तपासणी
नागपूर समाचार : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील आमडी ग्रामपंचायत येथील अमृत सरोवर स्थळी मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धन व हरित महाराष्ट्राच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ग्रामस्थांच्या सहभागातून यशस्वी झाले.
“वृक्ष हेच जीवन – पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे” या संकल्पनेतून हरित महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार करण्याचे मा. आयुक्तांनी सर्वांना आवाहन केले. कार्यक्रमात महिला बचत गटांचा सक्रीय सहभाग लाभला. महिला बचत गटांचे सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण हेच खऱ्या परिवर्तनाचे पाऊल असे प्रतिपादन यावेळी आयुक्तांनी व्यक्त केले. मनरेगा अंतर्गत महिला बचत गटांनी कामांमध्ये सहभागी होऊन सक्षमीकरणाची दिशा घ्यावी, असे आवाहन देखील यावेळी केले.
यानंतर, आयुक्तांनी पारशिवनी तालुक्यातील बनपुरी आणि मौदा तालुक्यातील निसदखेडा या ग्रामपंचायतींना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संबंधित गावांच्या सरपंचांसोबत चर्चा केली तसेच मनरेगा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचा कामनिहाय आढावा घेतला.
मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये करण्यात आलेल्या दुतर्फा वृक्ष लागवड, फळबाग लागवड, सिंचन विहीर, बांबू लागवड, सिमेंट काँक्रीट रस्ते या कामांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. ही पाहणी ग्रामविकासाच्या दृष्टीने प्रभावी ठरली असून स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या विकासकामांची पारदर्शकता व गुणवत्ता वाढवण्याचा उद्देश असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
प्रसंगी उपायुक्त (मनरेगा) श्री अरविंद उपरीकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती स्वाती देसाई, गटविकास अधिकारी (नरेगा) जि. प. श्रीमती वंदना भेले, गटविकास अधिकारी परशिवनी श्री. सुभाष जाधव तसेच, मनरेगा आयुक्तालयातील राज्य एम आय एस समन्वयक श्री अभय तिजारे, आईसी समन्वयक श्री संकेत रामराजे, श्री. रविंद्र भुते, श्री. इमरान शेख, श्री चंदू गोमासे, श्री दर्शन आंबेडकर व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.