सर्वोच्च पदावर काम करणारा अधिकारी असला तरी त्याला जातीयवादाला तोड द्यावे लागते
नागपूर समाचार : वंचित घटकांच्या विकासासाठी सामाजिक आणि प्रशासकीय तज्ञांनी एकत्र यावे, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
समाज कल्याण विभाग आणि सामाजिक व आर्थिक समता संघ यांचे संयुक्त विद्यमाने प्रा. डॉ. सुखदेव थोरात लिखित वंचितांचे वर्तमान या ग्रंथावर परीचर्चाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाप्रसंगी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण झाली तरी समाज हा जाती जातीत विभागला गेला आहे जात ही कधी जात नाही. सर्वोच्च पदावर काम करणारा अधिकारी असला तरी त्याला जातीयवादाला तोड द्यावे लागते. यासाठी आपला पुन:विचार करण्याची आवश्यकता आहे. सत्ता, पैसा, पद शिक्षण मिळवून हे थाबेल हा समज खोटा ठरला. जातीय आधारीत भेदभाव हा जागतिक पातळीवर देखील आहे. त्याविरोधी वैश्विक व्यासपीठावर बोलल्या जावू लागले. आरक्षण हे इतिहासात झालेल्या नुकसानीची भरपाई या दृष्टीनेच आपण बघितले पाहिजे. याकरीता समाज कल्याण विभागाची फार महत्तवपूर्ण भूमिका आहे. उदा. शिक्षणाकरीता देण्यात येणारे विविध बोर्ड द्वारे जसे की, स्टेट, सीबीएसी, आयसीएससी याद्वारे देण्यात येणाऱ्या विषमता आधारीत शिक्षण विविध व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेसाठी कसे समान संधी निर्माण करता येईल यावर विचार करण्याची गरज आहे किंवा समानता निर्माण करावी लागेल जेणेकरुन जात ही समस्या सुटु शकेल. वंचित समूहांनी समांतर आर्थिक व्यवस्था निर्माण करणे या तांत्रिक युगात गरजेचे आहे. असे त्यांनी आवाहन करुन आमची सामाजिक न्याय विभागाची संपूर्ण यंत्रणा सहकार्य करेल, असे डॉ. प्रशांत नारनवरे त्यांनी आश्वासन दिले.
या कार्यक्रमात वंचितांचे वर्तमान या पुस्तकाचे मान्यवरांचे हस्ते विमोचन करण्यात आले. त्यानंतर या पुस्तकावर आधारीत परीचर्चेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये, सत्र 1 मध्ये महाराष्ट्रातील गरीबी, विषमता व भेदभाव यावर विश्लेषण व धोरण या विषयावर चर्चा करण्यात आली. सा सत्रात डॉ. श्रीनिवास खांदेवाले, डॉ. एम.एल. कासारे, प्रभू राजगडकर, डॉ. गौतम कांबळे, हे प्रमुख वक्ते होते. सत्र 2 मध्ये महाराष्ट्रातील राजकारण : समस्या व दलितांचे राजकारण या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये डॉ. जोगेंद्र गवई, प्रा. डॉ. विकास जांभूळकर प्रा. डॉ. शैलेंद्र लेंडे हे प्रमुख वक्ते होते. सत्र 3 मध्ये, हिंदूत्ववाद : वर्तमान परिस्थितीच्या संदर्भात डॉ. सुखदेव थोरात यांनी आपले विचार मांडले
या प्रसंगी किशोर खांडेकर, डॉ. त्रिलोक हजारे, डॉ. पारीश भगत, प्रा. विद्या चोरपगार, आदी उपस्थित होते.