नागपूर समाचार : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)च्या कार्यकारी अध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे शनिवारी नागपुरात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलयाच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत, अशा कोणत्याही हालचालीची माहिती ना त्यांना आहे ना पक्षाध्यक्ष शरद पवार यांना, असे सांगितले.
माध्यमांशी संवाद साधताना सुळे म्हणाल्या की, काँग्रेसमध्ये विलयाच्या चर्चांची माहिती त्यांना माध्यमांतूनच मिळाली आहे. पक्षाकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नसून या केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींवरून अनावश्यक तर्कवितर्क लावले जात असल्याचे सांगत त्यांनी विविध केंद्रीय मंत्री आणि नेत्यांसोबत होणाऱ्या भेटी या राजकीय व प्रशासकीय प्रक्रियेचा भाग असल्याचे नमूद केले.
देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना सुळे यांनी पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावून अर्थव्यवस्थेवर सखोल चर्चा करावी, अशी मागणी केली. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि युवकांच्या प्रश्नांवरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
राजकीय पक्षांनी आरोप-प्रत्यारोपांपेक्षा जनतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगत सुळे म्हणाल्या की, देशासमोरील आव्हानांवर उपाय शोधणे हीच सध्याची प्राथमिकता असली पाहिजे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाचे समर्थन करत सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत अधिक संवेदनशीलता दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.




